मंदिरात होणारे मुख्य कार्यक्रम
- पंचायतन यज्ञ याग
- व्यास पौर्णिमा (गुरू पौर्णिमा)
- श्री कृष्ण जयंती
- श्रावणी सोमरा (दुसरा) अभिषेक
- नवरात्र उत्सव (नवदूर्गा)
- दत्त जयंती उत्सव सोहळा (पालखी प्रदक्षिणा)
- यात्रा (पौष महिना, कृष्ण पक्ष)
- माघी गणेश जन्म
- हरिनाम यज्ञ सप्ताह (पारायण, कीर्तन, भजन)
- महाशिवरात्री (अभिषेक)
- या व्यतिरिक्त दर पौर्णिमा व गुरूवारी संकल्प होतात.
परमपूज्य दत्तदास दहिवलीकर महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन त्यांनीच दिलेल्या प्रेरणेनुसार गोरगरिबांना पैशाअभावी गाणगापूर येथे जाता येत नाही. त्यामुळे दत्त महाराजांच्या सेवेचा लाभ घेता येत नाही. सध्याच्या युवा पिढीला भगवंताचे नामस्मरण म्हणजे काय याची कल्पना व महत्त्वही माहित नाही. पूजापाठ, नामस्मरण, चिंतन, मनन, वाचन ह्या गोष्टींपासून आजची पिढी फारच दूर आहे. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना अनेक प्रकारचे धोके पत्करावे लागत आहेत. टीव्हीवरील पाश्चात्य कार्यक्रमांतील भोगी जीवन मार्ग म्हणजे जीवनाचा उपभोग घेण्याचा सोपा मार्ग अशा चुकीच्या समजुतीने ते त्यात मनसोक्त रंगून व्यसनांच्या अधील झाले आहेत. त्यामुळे अनेक व्याधी व भूत पिशाच्च बाधेचा त्रासही त्यांना करावा लागत आहे. संतती प्राप्तीसाठी अनेकजण चुकीच्या मार्गाने अनुकरण करीत आहेत. त्यामुळे ते जीवनात अयशस्वी झाले आहेत. सर्वांचा मनोमन विचार करून यातून त्यांना मुक्त होण्यासठी जगद्गुरू श्री दत्तात्रेयांच्या दत्तपादुकांची जनकल्याणप्रीत्यर्थ औदुंबराखाली प्रतिष्ठापना केली आहे.
आज त्याचा विस्तार एवढा झाला आहे की ते इवलेसे रोप ज्या दारी लावले त्या रोपाची वेल जनकल्याणासाठी गगनाला जाऊन त्याचा भव्य मंडप तयार झाला आहे. आज त्याच मंडपामध्ये विश्वशांतीसाठी आतापर्यंत 29 अखंड हरिनाम सप्ताह होऊन गेले आहेत. दिवसेंदिवस या कार्याची व्याप्ती वाढून व्यसन मुक्ती, भूत-पिशाच्च बाधा -निवारण, संतती प्राप्ती या गोष्टी दत्तात्रेयांच्या शक्तीने आणि सद्गुरूंच्या आशीवार्दाने निवारण होत आहे.
याच श्रद्धेतून विश्वस्त मंडळाने अनेक विधायक उपक्रमांचा संकल्प सोडला आहे.
- दत्तदासांचे दास दत्त मंदिर श्री क्षेत्र रायपाटण देवस्थानात चांगल्या प्रकारची पूजाअर्चा आणि विविध धार्मिक, सामाजिक उत्सव साजरे करणे. त्यायोगे समाजाचे ऐक्य साधून समाजशक्ती विधायक कार्याला लावणे.
- विविध वयोगटातील व्यक्तींसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, आरोग्य शिबिर, छंदवर्ग, क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करणे.
- अपंग व दुर्बल व्यक्तींना सर्वतोपरी साहाय्य करणे.
- नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्तींच्यावेळी आपदग्रस्तांना मदत करणे.
- गुरूपौर्णिमा, देवतांचे जन्मोत्सव इत्यादी परंपरागत धार्मिक उत्सव साजरे करणे तसेच प्रवचन, कीर्तन, पारायण, भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मार्गदर्शन करणे.
- विविध कार्यक्रमांद्वारे जनप्रबोधन करणे, हुुंडाबळी, नशाबंदी, दारूबंदी आणि कुटुंब नियोजन यांसारख्या शासकीय कार्यक्रमांस प्रोत्साहन देणे.
- शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे आणि गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे.
- व्याधिग्रस्त, निराधार, घटस्फोटिता, अनाथ बालके इत्यादींच्या मदतीसाठी आणि शुश्रृषेसाठी अनाथश्रम, वृद्धाश्रम व आधाराश्रम उभारणे.
- सामुदायिक विवाह घडवून आणणे आणि कौटुंबिक समुपदेशन करणे.
विश्वस्त मंडळातर्फे राबविण्यात येणारे काही महत्त्वाचे उपक्रम
आरोग्य शिबिर : दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर आणि सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन भायखळा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर मंदिराचे विश्वस्त आणि हृदयशल्य विशारद डॉ. रवींद्र पेंडकर यांच्या पंधरा सहकार्यांच्या उपस्थितीत मोफत हृदयरोग चिकित्सा, नेत्र चिकित्सा, त्वचारोग, बालरोग, मधुमेह, रक्तदाब, दंत चिकित्सा, स्त्रीरोग इत्यादी रोगांवर उपचार करण्यात आले. याचा फायदा सुमारे 1 हजार भाविकांनी-भक्तांनी घेतला. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आखण्याचा विश्वस्तांचा मानस आहे.
शैक्षणिक अभियान : शासनाच्या परवानगीने इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून मंदिर न्यासातर्फे सराव करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन आणि तयारी करून घेतली जाते. तसेच परीक्षांचे आयोजनही केले जाते.
श्री दत्तदासांचे दास स्वामी महादेवानंदजी दत्त मंदिर ट्रस्ट, रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरीच्या सौजन्याने पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिनांक 24 जानेवारी 2007 रोजी घेण्यात आल्या. राजापूर तालुक्यातील 34 केंद्र शाळांमध्ये एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेतल्या. संपूर्ण तालुक्यातून मराठी माध्यमाचे - माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 1315 व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी 2934 विद्यार्थी परीक्षेला बसले. उर्दू माध्यमाचे 78 + 176 व इंग्रजी माध्यमाचे 14 + 30 मिळून 298 मुलांची सराव परीक्षा घेण्यात आली. त्यातून पूर्व प्राथमिक विभागातून 15 आणि माध्यमिक विभागातून परीक्षेसाठी 15 विद्यार्थी असे मिळून 30 विद्यार्थ्यांचा 30 जानेवारी 2007 रोजी दत्त मंदिर रायपाटण येथे परम पूज्य सद्गुरू बांबरकर महाराज यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या सराव परीक्षेतील 70 टक्के मुले महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा मंडळात उत्तीर्ण झाली.
अध्यात्मिक उपक्रम : दत्तभाविकांना आपल्या स्वत:च्या अडचणी निवारण व्हाव्यात म्हणून यज्ञयाग, गणेशयाग, दत्तयाग, रूद्रयाग, सूर्ययाग आणि नवचंडी यज्ञ हे उपक्रम सामान्य भाविकांना त्याचा लाभ व्हावा म्हणूनच मंदिराच्यावतीने विनामूल्य आयोजित केले जातात. अनेकांना याविषयी चांगल्या अनुभूती आल्या आहेत.
शिव (रूद्र) : सृष्टीची उत्पत्तीच मुळी ॐ मधून झाली आहे हे सर्वमान्य आहे. प्रथम तेज व नंतर ध्वनी हीच परिस्थिती आकाशात वीज चमकते तेव्हा प्रत्यक्ष अनुभवास येते. ॐ मधून जी शक्ती निर्माण झाली तीच शिव शक्ती होय. प्रथम त्यातून जो सूक्ष्म तेज बिंदू उदयास आला तो शिव.
दत्त (त्रिगुणात्मज) : शिवाच्या अंगच्या (उत्पत्ती-स्थिती-प्रलय) अर्थात रज-सत्व-तम ह्या तीन गुणांमधून मनुष्याकृती देवता उदयास आली. हीच त्रिमूर्ती होय. तिन्ही देवता तीन गुणांची प्रतिके आहेत. दत्तात्रयांना केलेल्या संकल्पाची सांगता शिव लिंगावरच केली जाते. कारण शिव ही मानवी देवता नसून ती स्वयंभू शक्ती आहे. जी निर्गुण-निराकार आहे.
सूर्य (तेजोमय) : सूक्ष्म तेज बिंदूचे विस्तारित रूप. जे जग प्रकाशमय करून अंधकाररूपी अज्ञानाचा नाश करते. पाच पंचमहाभूतांच्या तत्त्वांवर सृष्टीची निर्मिती झाली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पाच तत्त्वे. या जगाचा निर्माता जो परमात्मा शिव त्याने पाचही महाभूतांना कामास जुंपून या जगाची कर्मरहाटी अविरत चालू ठेवली आहे. आपल्या आध्यात्मामध्ये जो गोष्ट आपण वापरात आणतो त्याचा आदर राखला जातो. म्हणूनच पूजा करताना प्रत्येक गोष्ट तांदूळ देऊन नमस्कार व आवाहन केलं जातं. अशाच प्रकारे पंचमहाभूतांची पूजा करून शांतीसाठी आवाहन केलं जातं.
सृष्टीची उत्पत्ती मुळातच सूक्ष्म तेज बिंदूतून झाली आहे. त्यालाच शिवशक्ती म्हटले जाते. त्याकारणाने तेजमय असणाऱ्या देवतेला प्रज्ज्वलीत करून सर्व देवतांना आपल्या पूर्वजरूपी ऋषी मुनींनी सर्व प्रकारची मंत्राद्वारे आहुती द्यायला सुरूवात केली त्यालाच आपण हवन म्हणतो. आम्ही मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात हवनाला महत्त्व देतो. यात हेतुने आम्ही मंदिरात देवतांचे यज्ञ याग करीत असतो.
तेजा पाठोपाठ ध्वनी हीच पुनरावृत्ती आपल्या देव पूजेत पाहायला मिळते. प्रथम समया लावल्या जातात व नंतर मंत्रोच्चार द्वारे पूजेला सुरूवात होते. ही असते रोजची थोडक्यात करायची पूजा. पण ऋषी मुनींनी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करून काही व्रत-वैकल्ये सुद्धा नेमून दिली आहेत. त्यातलीच एक मोठं सर्वांना एकत्र आणून परमेश्वराचं निरंतर सात दिवस रात्र ईश्वराचं नामस्मरण करून आम्ही मंदिरात साजरा करतो. तो हरिनाम सप्ताह. त्याचा उगम ध्वनी संगीतातून झाला आहे. अशाप्रकारे भजन, अभंग, कीर्तन, वाद्ये, प्रवचनाद्वारे परमेश्वराची भक्ती केली जाते.
दत्तवारी : दत्तवारी प्रत्येक वर्षी साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात 2001 सालापासून सुरू करण्यात आली आहे. दत्तवारीची सुरूवात श्री क्षेत्र रायपाटण आणि मुंबई येथून होते. 2006 सालापासून दत्तवारीला भाविकांकडून चांगला वाढता प्रतिसाद मिळत असल्यामुळे मुलुंड, भांडूप, ठाणे, कल्याण आणि कांदिवली ह्या विभागांतून भाविकांसाठी लक्झरी बसची व्यवस्था करण्यात येते. या दत्तवारीत भाविकांची राहण्याची व्यवस्था, चहा, अल्पोपहार आणि जेवण याची सोय मंदिरातर्फे करण्यात येते.